'मध्यमवर्गातल्या त्याच त्याच पात्रांवर तेच तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणी धरू शकत नाही. यात बिचार्या लेखकाचाही दोष नाही. मध्यमवर्गापलिकडलं अफाट जग बिचार्याने कधी बघितलेलंच नाही. अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार?......'
नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो. त्यात कुणाचे काय गेले? लेखकाला प्रत्येक तर्हेच्या आयुष्यावर लिहिण्याची काय सक्ती असते की काय? माझे वाचक माझ्या पुस्तकांवर होते ना खूष? तेवढे पुरेसे नव्हते का?
अचानक मनात विचार चमकून गेला. या वेडीवर लिहावे का? घ्या, मध्यमवर्गापल्याडचीच गोष्ट आहे म्हणावं. मी कागद समोर ओढून ओळी खरडायला सुरुवात केली.
"श्रीराम... श्रीराम" बाजूला आवाज आला म्हणून मी मान वळवून बघितलं. मघाचा तो म्हातारा हमाल माझ्याशेजारी येऊन बसला होता. माझं त्याच्याकडे लक्ष आहे असं वाटल्यासारखा तो बोलायला लागला. बरंचसं स्वतःशी आणि काही माझ्याशी...."सायेब तुमी सांगा हे बरं का?.. काहून ही पोरं तिला तरास देत्यात? सगळे माजलेत. राहनार सगळे हितेच. पण ती त्यान्ला काय डिष्टर्ब करत नाई वो. तेच रोज हिला छळणार आनि ही भांडणार. तेपन शिव्या देनार. पण मार कोनाला? हिला... एकदा नाई शेंभरदा सांगितलं, नको त्यांच्या नादी लागत जाऊ. ध्यानात राहील तर ना वो...
काय प्राब्लेम झाला तिचा कुनाला ठावं... मुंबईत होती का काय जनू... हिकडं कुनी आनून टाकलं ठावं न्हाई. आनली तवा बेसुध व्हती ती. जाग आली न् काय झालं कुनाला ठावं! डोस्कं फिरल्यागत झालं तिचं. रडत काय व्हती, मोठ्यानं वरडत काय व्हती... सारखी मुंबईची गाडी कोन्ची? मुंबईची गाडी कोन्ची? गाडी आली की पळत जानार, पन गाडीत चढनार नाय... गाडी निघून गेली की ठेसनावर कपाळ बडवत बोंबलनार. मंग तेबी बंद...आता मुक्यावानी हिंडती, नायतर कोपर्यात बसून असती. फकस्त तिला कुनी वावगं, वंगाळ बोललं की लई खवळती.. लई खवळती... तीपन काय करनार वो?" त्याचा आवाज हळूहळू लहान होत गेला. 'श्रीराम... श्रीराम' फक्त ऐकू येत राहिलं.
संपूर्ण कथा खालील दुव्यावर आहे.
http://vishesh.maayboli.com/node/95
Wednesday, December 31, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
चांगली लिहिली आहेस.
सत्यकथा आवडली. सुरूवातीपासून अखेरपर्यंत कथेचा ओघ छान प्रवाही राहिला आहे.
Post a Comment