Tuesday, March 12, 2013

गझल


लहानपणी माझ्या भावाने एक तीन ओळींची कविता केली होती. आकाराने लहान असलेली ही कविता गूढ आणि आशय खच्चून भरलेली होती. ती अजूनही कवी वा एकमेव वाचक (पक्षी: मी) दोघांनाही कळलेली नाही. (कवीने स्वतः प्रकाशित केल्यास ती कविता तात्काळ शेअर करून रसग्रहणार्थ वाचकांना उपलब्ध करून देण्यात येईल! असो.) मग मी पण कविता करण्यासाठी अभ्यास सुरू केला. भाऊ वापरत असे तीच पेन्सिल आणि तशीच वही आणून पहिली कविता लिहिली. ती अगदीच-

'आला आला पाऊस.
पावसात भिजायची, मला भारी हाउस.'[१]छाप सुबोध झाली होती. बॉलपेन, शाईपेन, जेलइंकपेन आणि वही, चित्रकलेच्या वहीच्या मागचा कागद, हँडमेड पेपर अशी साधने बदलून प्रयोग करून पाहिले. तरी उपरोल्लेखित गूढ कवितेसारख्या कविता जमेनात. मग सुबोध कविताच लिहाव्यात, असे मनाशी पक्के केले. मग अभ्यास-ए-गझल करून सुबोध गझल लिहिली. ग्रामीण बंधू-भगिनींसाठी 'शिरपा-कमळीच्या कविता' हे छोटेखानी पुस्तक लिहिले. शेतीच्या कामांमधून आपल्या ग्रामीण बंधुभगिनींना वाचन करण्यास वेळ कमी मिळतो, त्यामुळे 'वेळ कमी, तरीही उच्चकाव्यानुभूतीची हमी' या योजनेअंतर्गत प्रकाशित झालेल्या 'शिरपा-कमळीच्या कविता' काव्यसंग्रहात दोन-दोन ओळींच्या सुबोध आणि आशयसंपन्न कविता आहेत. वानगीदाखल ही एक कविता-

'अरे ए कमळी, मेरी जानेमन, तुझसे नजरिया लडी.
हे बेब गेट अप अँड गिव्ह मी सम आंबावडी.'

खेडोपाडी पोचलेले केबल नेटवर्क, त्यामुळे वाढलेले हिंदी सिनेम्यांचे वेड आणि त्यामुळे बदलत चाललेली ग्रामीण भाषा व संस्कृती या दोन ओळींमधून आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोचत नाही काय? आता आपण माझी एक सुबोध गझल पाहू. चंद्र कलेकलेने वाढावा तशी शेराशेराने गझल वाढते.[२] हे सगळे शेर वेगवेगळे विषय घेऊन आलेले असू शकतात, हे किती रम्य आहे! ते कळल्यानंतर 'शिरपा-कमळीच्या कविता' पान ५८ ते ६७ ही दहाशेरी गझलच आहे, नाही का हो?' असे मी माझ्या गझलगुरूंना विचारले तेव्हा त्यांनी मंद हास्य करून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. नंतर ते संन्यास घेऊन हिमालयात गेले. असो.

गझल पेश-ए-खिदमत करते. सुबोध व्हावी म्हणून प्रत्येक शेराखाली विषय दिलेला आहे.

गलीगलीमें आजकाल हाच शोर आहे
आजचा अलिबाबा हा एक्केचाळिसावा चोर आहे
* 'अरेबियन नाईट्स'च्या रुपकातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य

मालवून टाकलास दीप, हात हाती घ्यावया
आपल्यावर लक्ष ठेवून (इश्श्श!), आकाशी चंद्राची कोर आहे
* रोम्यांटिक

हंसाने ऑफर केले १००% प्युअर दूध,
गेस्ट म्हणून आलेला सरस्वतीचा मोर आहे
* नीरक्षीरविवेक, 'अतिथी देवो भव' आणि पुराणांतली माहिती

झुडपेबाबांचं नाव घ्यून पक्यादादाकडे लावला आकडा
समदा पैसा ग्येला, पक्या भXX XXXखोर आहे
* अंधश्रद्धा, सामाजिक समस्या आणि मनातल्या भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण

रोहित शेट्टीच्या सिन्म्यांचे हाय हे काय झाले?
अजिचबात पाहवेना, बोलबच्चन बोर आहे
* जिव्हाळ्याचा विषय - बॉलीवूड

पहाट झाली, बैल घेऊन शेतात निघाला शेतकरी,
गावचा पैलवान शंभूदादा मारतो बैठका, जोर आहे
* ग्रामीण जीवनाचे रम्य चित्रण

पाऊस पडतो तसाच, परि तूस मिळावी कांदाभजी कोठूनी?
पुणे नव्हे हे 'श्रद्धा', हे तर सिंगापोर आहे.
* वस्तुस्थितीची दु:खद जाणीव व खिन्नपणा, खेरीज येथे शेवटच्या शेरात नाव गुंफण्याची प्रक्रिया केली आहे.

[१] याच ओळी वापरून मी अजून एक सुबोध कविता केली आहे. ती पुन्हा केव्हातरी!

[२] माझ्या लखनऊच्या आंटी आलेल्या तेव्हा बिर्याणीची तयारी करताना आम्ही जात्यावर ओव्या म्हणतो त्यापद्धतीने एकेक एकेक शेर म्हणत गझल रचली होती. नंतर प्रत्येकाच्या पानात बिर्याणी वाढल्यावर त्या-त्या व्यक्तीने एकेका शेराने गझल वाढवायची, असेसुद्धा केले होते. अब्बूजानचा शेर इतका कातिल होता की अम्मीजानने त्यांच्या पानात दोन डाव बिर्याणी अजून वाढली बक्षीसादाखल! ती पंचाहत्तरशेरी गझल लखनऊच्या आंटींनी कॅलिग्राफीत त्यांच्या स्वैंपाकघराच्या भिंतीवर कोरून घेतली आहे.

2 comments:

Avani1405 said...

lay bharee maate!!!!

Vidya Bhutkar said...

Ashakya. :)