Tuesday, March 12, 2013

गझल


लहानपणी माझ्या भावाने एक तीन ओळींची कविता केली होती. आकाराने लहान असलेली ही कविता गूढ आणि आशय खच्चून भरलेली होती. ती अजूनही कवी वा एकमेव वाचक (पक्षी: मी) दोघांनाही कळलेली नाही. (कवीने स्वतः प्रकाशित केल्यास ती कविता तात्काळ शेअर करून रसग्रहणार्थ वाचकांना उपलब्ध करून देण्यात येईल! असो.) मग मी पण कविता करण्यासाठी अभ्यास सुरू केला. भाऊ वापरत असे तीच पेन्सिल आणि तशीच वही आणून पहिली कविता लिहिली. ती अगदीच-

'आला आला पाऊस.
पावसात भिजायची, मला भारी हाउस.'[१]छाप सुबोध झाली होती. बॉलपेन, शाईपेन, जेलइंकपेन आणि वही, चित्रकलेच्या वहीच्या मागचा कागद, हँडमेड पेपर अशी साधने बदलून प्रयोग करून पाहिले. तरी उपरोल्लेखित गूढ कवितेसारख्या कविता जमेनात. मग सुबोध कविताच लिहाव्यात, असे मनाशी पक्के केले. मग अभ्यास-ए-गझल करून सुबोध गझल लिहिली. ग्रामीण बंधू-भगिनींसाठी 'शिरपा-कमळीच्या कविता' हे छोटेखानी पुस्तक लिहिले. शेतीच्या कामांमधून आपल्या ग्रामीण बंधुभगिनींना वाचन करण्यास वेळ कमी मिळतो, त्यामुळे 'वेळ कमी, तरीही उच्चकाव्यानुभूतीची हमी' या योजनेअंतर्गत प्रकाशित झालेल्या 'शिरपा-कमळीच्या कविता' काव्यसंग्रहात दोन-दोन ओळींच्या सुबोध आणि आशयसंपन्न कविता आहेत. वानगीदाखल ही एक कविता-

'अरे ए कमळी, मेरी जानेमन, तुझसे नजरिया लडी.
हे बेब गेट अप अँड गिव्ह मी सम आंबावडी.'

खेडोपाडी पोचलेले केबल नेटवर्क, त्यामुळे वाढलेले हिंदी सिनेम्यांचे वेड आणि त्यामुळे बदलत चाललेली ग्रामीण भाषा व संस्कृती या दोन ओळींमधून आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोचत नाही काय? आता आपण माझी एक सुबोध गझल पाहू. चंद्र कलेकलेने वाढावा तशी शेराशेराने गझल वाढते.[२] हे सगळे शेर वेगवेगळे विषय घेऊन आलेले असू शकतात, हे किती रम्य आहे! ते कळल्यानंतर 'शिरपा-कमळीच्या कविता' पान ५८ ते ६७ ही दहाशेरी गझलच आहे, नाही का हो?' असे मी माझ्या गझलगुरूंना विचारले तेव्हा त्यांनी मंद हास्य करून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. नंतर ते संन्यास घेऊन हिमालयात गेले. असो.

गझल पेश-ए-खिदमत करते. सुबोध व्हावी म्हणून प्रत्येक शेराखाली विषय दिलेला आहे.

गलीगलीमें आजकाल हाच शोर आहे
आजचा अलिबाबा हा एक्केचाळिसावा चोर आहे
* 'अरेबियन नाईट्स'च्या रुपकातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य

मालवून टाकलास दीप, हात हाती घ्यावया
आपल्यावर लक्ष ठेवून (इश्श्श!), आकाशी चंद्राची कोर आहे
* रोम्यांटिक

हंसाने ऑफर केले १००% प्युअर दूध,
गेस्ट म्हणून आलेला सरस्वतीचा मोर आहे
* नीरक्षीरविवेक, 'अतिथी देवो भव' आणि पुराणांतली माहिती

झुडपेबाबांचं नाव घ्यून पक्यादादाकडे लावला आकडा
समदा पैसा ग्येला, पक्या भXX XXXखोर आहे
* अंधश्रद्धा, सामाजिक समस्या आणि मनातल्या भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण

रोहित शेट्टीच्या सिन्म्यांचे हाय हे काय झाले?
अजिचबात पाहवेना, बोलबच्चन बोर आहे
* जिव्हाळ्याचा विषय - बॉलीवूड

पहाट झाली, बैल घेऊन शेतात निघाला शेतकरी,
गावचा पैलवान शंभूदादा मारतो बैठका, जोर आहे
* ग्रामीण जीवनाचे रम्य चित्रण

पाऊस पडतो तसाच, परि तूस मिळावी कांदाभजी कोठूनी?
पुणे नव्हे हे 'श्रद्धा', हे तर सिंगापोर आहे.
* वस्तुस्थितीची दु:खद जाणीव व खिन्नपणा, खेरीज येथे शेवटच्या शेरात नाव गुंफण्याची प्रक्रिया केली आहे.

[१] याच ओळी वापरून मी अजून एक सुबोध कविता केली आहे. ती पुन्हा केव्हातरी!

[२] माझ्या लखनऊच्या आंटी आलेल्या तेव्हा बिर्याणीची तयारी करताना आम्ही जात्यावर ओव्या म्हणतो त्यापद्धतीने एकेक एकेक शेर म्हणत गझल रचली होती. नंतर प्रत्येकाच्या पानात बिर्याणी वाढल्यावर त्या-त्या व्यक्तीने एकेका शेराने गझल वाढवायची, असेसुद्धा केले होते. अब्बूजानचा शेर इतका कातिल होता की अम्मीजानने त्यांच्या पानात दोन डाव बिर्याणी अजून वाढली बक्षीसादाखल! ती पंचाहत्तरशेरी गझल लखनऊच्या आंटींनी कॅलिग्राफीत त्यांच्या स्वैंपाकघराच्या भिंतीवर कोरून घेतली आहे.

Wednesday, January 16, 2013

कहाणी रक्षाबंधनाची (म्हणजेच 'द टेल ऑफ राखी फेस्टिव्हल')


दरवर्षी राखी फेस्टिव्हल (इट्स रक्षाबंधन इन मराठी बर्का, माय मराठी स्पीकिंग फ्रेंड्स!) आला की माझ्या लहान भावास मी या फेस्टिव्हलनिमित्त हाताने हितोपदेश लिहून पाठवते. आपल्यापेक्षा यंगर सिबलिंग्जना चार चांगल्या गोष्टी सांगायची जबाबदारी आपल्यावरच असते, असे माझे पक्के मत आहे. (मामस्पीफ्रें, मत म्हणजेच ओपिनियन बर्का, नायतर तुम्हांला वोट वाटायचे.) तर यंदाच्या पत्रात मी त्याला रक्षाबंधन फेस्टिव्हल कसा सुरू झाला त्याची रोचक कहाणी पाठवली होती. तीच तुमच्यासाठी इथे पुनर्प्रकाशित करत आहे. (मामस्पीफ्रें, पुनर्प्रकाशित म्हणजे माहीत नसेल तर यू नीड मराठी ट्यूशन्स! मी स्पूननी जेवण्याच्या विरुद्ध आहे.) असो. नमनाला घडाभर ऑलिव्ह ऑइल झाले. तर ऐक्क्का!!!

लाँग लाँग अ‍ॅगो, व्हेरी लाँग अ‍ॅगो, नोबडी नोज हाऊ लाँग अ‍ॅगो, एक भाऊ नि त्याची ल्हान बहीण जंगलात गेले. तिकडे त्यांना दिवस बुडायच्या आत एक्झॉटिक मशरूम आणि हरणाची शिकार घरी न्यायची होती. वेळ कमी होता, तेव्हा भाऊ म्हणाला, "भैणी, तू मशरूम कलेक्ट कर. मी हरणासाठी लुक फॉर करतो." बहीण उत्तरली (मामस्पीफ्रें, इथे तुम्हांला हेल्प नीडेड आहे का?) "ब्रो, ठीक आहे. पण समजा, मध्ये काही प्रॉब्लेमो आला तर मी तुला कसे बोलावू?" मग भाऊ पाचदहा मिनिटे थिंकला. (इट्स 'थिंकला' बर्का, मामस्पीफ्रें! नॉट 'शिंकला'.. तपकीर ओढणारेसुद्धा सलग पाचदहा मिनिटे नाही शिंकू शकत. इट इज सुपरनॅचरल!) आणि ढँटॅडँ! त्याला आयडिया मिळाली. त्याने पायजम्याच्या नाडीचे एक बंडल खिशातून काढले व त्याचे एक टोक बहिणीला त्याच्या उजव्या हाताला बांधायला सांगितले. मग ते आपापल्या कामांना गेले. अचानक एक अस्वल आपली पॉवर नॅप संपवून झाडीतून बाहेर आले व त्याने काही कामधाम नसल्याने बहिणीवर हल्ला केला. (रिकामे मन, डेव्हिलचे घर अथवा वर्कशॉप म्हणतात ते काही खोटे नाही.) बहिणीने दोरी ओढली आणि भावाला सिग्नल मिळाला. तो पळत तिथे आला नि त्याने अस्वलाच्या कमरेत लाथ घालून त्याला हाकलले. अस्वल तिथून उडाले ते थेट ऑर्थोपेडिक सर्जनच्या टेबलावरच जाऊन आडवे झाले. अशाप्रकारे भावाने बहिणीची रक्षा केली. तेव्हापासून त्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला बहिणीने दोरी बांधायची प्रथा सुरू झाली. पहिलेपहिले पायजम्याची नाडीच बांधत असत (कचर्‍यातून कला, एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली रिसायकलिंग, टाकाऊतून टिकाऊ, इत्यादी गोष्टी ध्यानात घेऊन!), पण एका भाऊबहीण जोडीने राखीसाठी त्यांच्या बाबांच्या चालू पायजम्यातली नाडी वापरली तेव्हा बाबांनी त्यांची हाडे मऊ केली. मग राख्या वेगळ्या बनवायला लागले. आता तर स्वारोव्स्की अशा रश्श्यन नावाचे क्रीस्टल लावूनही राखी बनवतात म्हणे!

विशेष टीपः कथा लिहिताना कुठल्याही रीयल अ‍ॅनिमलला हर्ट केलेले नाही.

Friday, December 21, 2012

'मायनी' माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा..


फार फार फार्फारचफार पूर्वी एक मायन आटपाट नगर होतं. तिथे एक मायन राजा होता. त्याला एक राणी (मायना[१]) व मायनी[२] नावाची मुलगी होती. मायनी जन्माला येण्याअगोदर कालगणना अस्तित्वात नव्हती. पण मायनी जन्माला आल्यावर तिचा सोळावा वाढदिवस (तेव्हाही सोळाव्या वरसाला फारचफार महत्त्व होते!) नक्की कधी करायचा, असा गहन प्रश्न पडल्याने राजाने लगेचच कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय घेतला.[३] या प्रोजेक्टसाठी आधी स्थानिक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले पण ते सगळे क्यांडिडेट इंटरव्ह्यूत फेल गेले. मग शेजारच्या राज्यातून एम१(मायन१) व्हिशावर (कमी पैशात) एकास घेण्यात आले. हा तरुण तिथल्या प्रख्यात विद्यापीठात शिकलेला, गोल्ड मेडलिस्ट, होतकरू, हॅंडसम तरुण होता. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हे देदीप्यमान यश त्याने मिळवले होते. त्याने ताबडतोब प्रोजेक्ट किकऑफ केला.

इकडे राजकन्या हळूहळू मोठी होत होती. होता होता ती सोळा वर्षांची झाली. तरुणाने केलेल्या अचूक दिनदर्शिकेमुळे अचूक दिवशी राजकन्येचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. त्याच दिवशी तिची आणि कॅलेंडर-तरुणाची ओळख करून देण्यात आली. ये मुलाकात कौनसा मोड लेगी, ये किसे पता था? 'सोळावं वरीस धोक्याचं' म्हणतात ते उगीच नाही. राजकन्या अगदी धाडकन कॅलेंडरतरुणाच्या प्रेमात पडली. पार्टीमध्ये तिला गाणे म्हणावयाचा आग्रह होताच तिने-
'मायनी माई[४] मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा.
जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संग लागा.'
हे गाणे म्हटले. भोळ्या राजाराणीला तेव्हा काही संशय आला नाही.

हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. 'तू जब जब मुझको पुकारे, मै दौडी आऊ नदिया किनारे' म्हणत राजकन्या त्याला भेटायला पळत पळत येऊ लागली. राजाराणीला वाटे, ऑलिम्पिकात पळण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी म्हणून सराव करते आहे. त्यांनी तिला कधीच अडवले नाही.

एके दिवशी वाळवंटातल्या मायन देवळातल्या वेदीच्या चबुतर्‍यावर ते दोन प्रेमी जीव बसले होते.[५] तिने त्याच्या डोळ्यांत पाहून म्हटले,
'कॅट आणि सल्लूपेक्षा आपल्या वयातला फरक तसा कमीच आहे नाही? 'कुछ तो लोग कहेंगे'च. पण तू लक्ष देऊ नकोस...'
अशा प्रकारे त्यांच्या गप्पा चालू असताना देवळातल्या पुजार्‍याच्या फोनमुळे ही बातमी कळलेला राजा तिथे आला. "परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन ये मायन कुलके तीन स्तंभ है..." त्याच्या दमदार आवाजातल्या वाक्यामुळे दोघेही एकदम दचकून भानावर आले. चिडलेल्या राजाने दोघांची ताटातूट केली. कॅलेंडर तरुणाचा व्हिसा ताबडतोब रद्द करून त्याला वाळवंटामार्गे पायी त्याच्या देशात परत पाठवण्यात आले.[६] कॅलेंडर तरुण मायन राज्यात फारच लोकप्रिय असल्याने जनतेचा रोष टाळण्यासाठी राजाने युक्ती केली. डॉटकॉम बबल आणि सबप्राईम क्रायसिस या दोन्ही गोष्टींमुळे एकदमच जागतिक मंदी आल्याचे जाहीर करण्यात आले व तरुणाची नोकरी याच मंदीमुळे तडकाफडकी गेल्याने त्याचा व्हिसा रद्द झाला, अशी माहिती आरटीआयअंतर्गत माहिती मागवणार्‍या लोकांना पुरवण्यासाठी तयार केली गेली. राजकन्येचे लग्न दुसर्‍याच एक राज्याच्या राजकुमाराशी लावून दिले गेले.

काही काळाने या सगळ्या गोष्टी थोड्या स्थिरावल्यावर राजाने कॅलेंडर प्रोजेक्टावर नजर टाकली. २१डिसेंबर, २०१२पर्यंतचे कॅलेंडर खोदून तयार होते. राजाने नवीन टीम तयार करून त्यांना कॅलेंडर प्रोजेक्ट पुढे चालू ठेवायची आज्ञा केली.

"पण महाराज, आपले राज्य अजून सीएमेम लेव्हल १लाच आहे. त्यामुळे कशाचेच काही डॉक्युमेंटेशन नाहीये. ह्या प्रोजेक्टवर तुम्ही आधी रिसोर्स क्रंचच्या नावाखाली तो एकच माणूस ठेवला होता आणि त्याच्यामुळेच हा प्रोजेक्ट चालू होता. आता हा पुढे चालू ठेवणे काय खरं नाही." एक रिसोर्स भीतभीत बोलला. त्याने नुकतेच पेपर टाकले होते आणि सध्या त्याचा नोटिस पिरियड चालू असल्याने त्याला एवढे बोलण्याचे धैर्य आले होते.[७]

मग जागतिक मंदी, बजेट कमतरता, रिसोर्स क्रंच, प्रोजेक्ट रेड झोनमध्ये जाणे, नवीन टीममधल्या चौघांना कालसर्पयोग असणे अशी अनेक कारणे देऊन राजाने प्रोजेक्ट गुंडाळला. पण '२१ डिसेंबर २०१२' ही शेवटची तारीख खोदलेले ते कॅलेंडर मात्र उरले.

आणि त्यावरून काही हजार वर्षांनी सुरू झाली २०१२च्या जगबुडीची वर्ल्डवाईड ब्लॉकबस्टर कहाणी! यात मायनी आणि कॅलेंडर तरुणाची प्रेमकथा मात्र हरवूनच (अथवा, वाहूनच) गेली.[८]

बोला पुंडलीकवरदाहारीविठ्ठल..

१. याचाच एक पाठभेद 'मैना' असाही आढळतो. राजाच्या राणीचे नाव मैना आणि एका भूभागाचे नाव 'पेरू' ही बाब लक्षणीय आहे.
२. 'इनी मीनी मायनी मो' हे बालगीत पहिल्यांदा तान्ह्या मायनीसाठीच म्हटले गेले म्हणून तिचे नाव त्या गाण्यात आहे.
३. 'कॅलेंडर छापणे' हा वाक्प्रचार कुठून आला ते चाणाक्ष, विचक्षण वाचकांस कळलेच असेल.
४. माई = मायन आई. मायनी माई = मायनीची आई. वडिलांना डॅडा म्हणत असत.
५. हा शीन आम्ही 'हम दिल दे चुके सनम'मधून कॉपी केलेला है. मायन राजकन्येला ऐश्वर्या रायसारका ड्रेसबी दिलेला है.
६. हिते आम्ही 'तडप तडप के इस दिल से आह निकलती रही..' हे गाणेसुद्धा कॉपी करून टाकले आहे.
७. ही मूळची मायन काळातली घटना. ही नंतर काहीशी बदलून 'नौकरी'वाल्यांनी आपल्या जाहिरातीत वापरली.
८. व्हाय धिस 'कॅलेंडरतरुण', 'कॅलेंडरतरुण' डी? त्याला नाव का नाही? क्वेच्चनका आन्सर बोले तो, आदमी की पैचान उसके नामसे नही, कामसे होती हय..